श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी “श्रावण व्रतवैकल्य” उपक्रमाचे आयोजन : सौ.वैशाली राजेश क्षीरसागर 

 

कोल्हापूर  : कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यानिमित्त श्रावण महिन्यात सोमवारी “श्रावण व्रत वैकल्य” या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली १३ वर्षे हा उपक्रम अखंडीतपणे राबविला जात आहे. हिंदू धर्मातील सणांची महती सर्वांना व्हावी, हिंदू धर्माचे जागरण व संघटन व्हावे, याकरिता समस्त हिंदू धर्म संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने श्रावण व्रत- वैकल्य या सामुदायिक उपवास सोडण्याच्या उपक्रमाची सुरवात झाली. यावर्षी या धार्मिक उपक्रमाचे श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि.२४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत “नष्टे लॉन, महावीर गार्डन जवळ, कोल्हापूर” येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा आणि भगिनी मंचच्या अध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने आयोजित श्रावण व्रतवैकल्य उपक्रमाची नियोजन बैठक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज शिवालय शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर येथे पार पडली.
या उपक्रमाची माहिती देताना सौ.वैशाली क्षीरसागर म्हणाल्या, सदर श्रावण व्रतवैकल्य कार्यक्रमाकरिता हिंदुत्ववादी कार्यकर्ते सकाळी कावडीने पंचगंगा नदी तीरावरून कावडीने पाणी आणतात. कार्यक्रमाच्या सुरवातीस पवित्र पंचगंगा नदी तीरावरून कावडीने आणलेल्या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस जलाभिषेक केला जातो. यानंतर गोमाता पूजन, ध्वजवंदन आणि शस्त्रपूजन होवून अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञास प्रारंभ होतो. यानंतर हिंदू देवतांचे पूजन, भारत मातेचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती झाल्यानंतर एकाचवेळी सर्वच जातीपंतातील १०८ दाम्पत्य केळीच्या पानांवर मंत्र घोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडतात. याकरिता हिंदू धर्मातील अनेक जातीपंतातील मान्यवर यजमान उपस्थित असतात. यावेळी इस्कॉन (ISKCON) चे भजन आणि कीर्तन आपल्या दिव्य सुरांनी आणि आध्यात्मिक ऊर्जेने मनाला मंत्रमुग्ध आणि शांत करतात.
हिंदू धर्म प्रगतीचे काम व्हावे, हिंदू संस्कृती जपण्याचे कार्य या माध्यमातून व्हावे या हेतूने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरवात करण्यात आली असून, या उपक्रमास शहरातील नागरिकांनी, हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते आणि हिंदू जणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी समस्त हिंदू धर्म संघटन व सकल हिंदू समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
यावेळी जेष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते बाबा वाघापूरकर, यादव महाराज, श्रीकांत पोतनीस, उदय भोसले, किशोर घाटगे, चंद्रकांत बराले, मधुकर नाझरे, निरंजन शिंदे, सुनील सामंत, कमलाकर किलकिले, विक्रम जरग, जी.जी.जोशी, विकास यादव, किरण दुसे, अर्जुन आंबी, श्रीमती पूजा भोर, आदी सकल हिंदू समाज व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!