पाटबंधारे विभागाने आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा : पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर: पाटबंधारे विभागाने कामाच्या नियोजनाचा आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा. असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिलेत. सिंचन भवन येथे आज कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. यावेळी नामदार सतेज पाटील बोलत होते. एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता कामाचे योग्य नियोजन करा, या विभागाची बदनामी होवू देवू नका अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.
कुंभी, कासारी आणि कडवी या प्रकल्पाच्या सल्लागार समितीची बैठक आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सिंचन भवन येथे पार पडली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी, एखाद्या प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जाणीवपूर्वक जास्तीचा निधी दिला जातो तर काही वेळा गरज असूनही त्याठिकाणी निधी खर्च केला जात नाही. यापुढे अशा चुका पाटबंधारे विभागाने करू नये. गेल्या पाच वर्षात कोणकोणती कामे केली आहेत? त्यासाठी किती निधी खर्च केला याची माहितीही यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी मागितली. प्राधान्याने कोणती कामे करावी लागणार आहेत. यासंबंधी आगामी तीन वर्षासाठीचा विस्तृत आराखडा तयार करावा. असे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. तसेच बळपवाडी, राई-कंदलगाव आणि गारिवडे बंधाऱ्याचे काम त्वरित मार्गी लावा अशा सूचनाही त्यांनी बैठकीत केल्या. दरम्यान या तिन्ही बंधाऱ्यांचा आराखडा अंतिम टप्प्यात असून त्याला मंजुरी मिळाल्या नंतर तातडीने ही काम मार्गी लावण्याच आश्वासन अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी दिले. वर्षभराच्या पाण्याचे योग्य नियोजन करा. शेती आणि औद्योगिक पाण्याचे नियोजन करा अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. धामणी प्रकल्पासाठी या वर्षी 40 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र कोरोनामुळे या निधीतील जवळपास 66 टक्के निधीला कात्री लागली आहे. त्यामुळे यावर्षी तेरा कोटींचा निधी धामणी प्रकल्पाच्या कामाकरिता मिळाल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुर्वे यांनी दिली. यावर बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी, या निधीमधून बंधाऱ्यांची दुरुस्ती करा आणि उर्वरित पैशातून धामणी प्रकल्पाच्या दुरुस्ती आणि इतर कामाचे नियोजन प्राधान्याने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 2019 मध्ये कोल्हापूर आणि सांगली मध्ये महापुराची परिस्थिती उद्भवली होती. त्या संबंधीचा सर्व डाटा अपडेट ठेवा जेणेकरून पुढील 20- 25 वर्षांनंतरही याची माहिती उपलब्ध होऊ शकेल अशा दृष्टीने तांत्रिकदृष्ट्या माहिती उपलब्ध करून ठेवण्याची सूचनाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. त्याशिवाय कृषी आणि पाटबंधारे विभागाकडे सिंचनाखाली असलेल्या क्षेत्राची आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याने या दोन्ही विभागांनी एकत्रितरित्या कोल्हापूर जिल्ह्यातील मोजणी करून घ्यावी. असंही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सांगितल. यावेळी अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी, कुंभी, कासारी आणि कडवी या प्रकल्पा अंतर्गत करण्यात आलेली काम आणि नियोजित कामासाबंधी माहिती दिली. कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी, गेल्या आर्थिक वर्षात सिंचनातून जवळपास पाच कोटींची वसुली. तर बिगर सिंचनातून जवळपास 25 कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती दिली. या बैठकीला कार्यकारी अभियंता ए. ए. नाईक , कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील, कार्यकारी अभियंता डी. डी शिंदे, स्मिता माने आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!