तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांच्या लाभासाठी पुढाकार घ्यावा :जिल्हाधिकारी 

 

कोल्हापूर : तृतीयपंथी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तृतीयपंथी व्यक्तींनी शासकीय योजनांच्या लाभासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा, असे आवाहन करुन यासाठी तृतीयपंथीयांना प्रत्येक विभाग निश्चित सहकार्य करेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्व अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन येथे ‘तृतीयपंथी सर्वसमावेशक एक दिवसीय कार्यशाळा’ घेण्यात आली, यावेळी जिल्हाधिकारी श्री. रेखावार बोलत होते. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रीतम कुमार पाटील, तृतीयपंथीयाच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय सदस्य श्रीगौरी सावंत व मयुरीताई आळवेकर, तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाच्या राज्य व जिल्हा सदस्य ॲड. दिलशाद मुजावर, जिल्हा प्रतिनिधी अमृता सुतार तसेच तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कंत्राटी पध्दतीने नोकरी देण्यात येणाऱ्या तृतीयपंथी गौरी पोवार यांना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, तृतीयपंथीयांची वैयक्तिक, शैक्षणिक, आर्थिक माहिती घेवून त्यांना त्यांच्या आवडीनुसार, क्षमतेनुसार कौशल्य शिक्षण देण्यात आले असून यापुढेही प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे, जेणेकरुन त्यांना रोजगार उपलब्ध करुन देता येईल. जिल्ह्यातील दोन तृतीयपंथीयांना कंत्राटी तत्वावर नोकरी देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!