कोल्हापूर /प्रतिनिधी: ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम,कोल्हापूर चित्पावन संघ आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
स्वर्गीय वा.रा तथा दादा धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी निमित्त ” संतांचे संगती” या विशेष निरूपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान ह.भ.प.सौ. रोहिणीताई परांजपे यांच्या रसाळ आणि अमृतवाणीतून संत महात्म्य आणि संत चरित्र ऐकण्याची सुवर्णसंधी कोल्हापूरकरांना घेता येणार आहे. सदर कार्यक्रम राम गणेश गडकरी सभागृह,पेटाळा येथे दररोज सायंकाळी ४.३० ते ७.३० या वेळेत असणार आहे. अशी माहिती ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. दीपक आंबर्डेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते म्हणाले ‘ पाच दिवस चालणाऱ्या या निरूपणामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या अलौकिक गाथा सांगण्यात येणार आहेत. तरी आत्मानंद देणाऱ्या या भक्तीमय सोहळ्याचा लाभ आवर्जून घ्यावा असे आवाहन ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम च्या वतीने करण्यात आले.हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून कार्यक्रम दिलेल्या वेळेत सुरू होणार असल्याने उपस्थित श्रोत्यांनी वेळेच्या दहा मिनिटे अगोदर स्थानापन्न होणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले .
पत्रकार परिषदेस मंगलाधामचे उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी चित्पावन संघाचे प्रसाद भिडे , श्रीकांत लिमये , मिलिंद पावनगडकर , नंदकुमार मराठे,श्रीराम टोपकर,सचिन जिल्हेदार, संतोष कोडोलीकर , धर्मराज पंडित,डॉ. उदय कुलकर्णी , अनिरुद्ध जावडेकर अशोक जोशी आदी उपस्थित होते.
