कोल्हापूर: भाजपसरकार बद्दल लोकांच्या प्रचंड अस्वस्थता आहे. लोक संतप्त आहेत. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आधी विचार करायला हवा होता. आता धडाधड काही निर्णय घेत आहेत. गेल्या पाच वर्षात काही केले नाही आणि आता हिताचे निर्णय तडकाफडकी घेतले जात आहेत याचा अर्थ पाच राज्यांच्या निवडणूक निकालाने चांगलाच धडा शिकवला असे वक्तव्य माजी कृषी राज्यमंत्री शरद पवार यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केले. हसन मुश्रीफ ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी तळागाळापर्यंत ते पोहोचले आहेत ते चांगले संघटक आहेत. संसदेपेक्षा त्यांचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जास्त उपयोग होईल पण जर त्यांनी आमच्यासमोर काही मत व्यक्त केले तर त्यांच्या मताचा आम्ही नक्कीच सन्मान करू असेही पवार यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात कॉंग्रेस, डावे पक्ष व शेकाप अशी आघाडी केली आहे. राहुल गांधी यांची भेट घेतली. तेव्हा महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत. 40 जागांवर आघाडी होण्याची शक्यता आहे. उर्वरित आठ जागाबाबत दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, या प्रमाणे जो पक्ष प्रभावी नियोजन करेल त्यावर अवलंबून असणार आहे. सवर्ण आरक्षणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले 50 टक्केपेक्षा जास्त आरक्षण हे न्यायालयात टिकूच शकत नाही. घटनेचा ढाचा बदलून हा निर्णय घेता येणार नाही. तसेच दुरुस्ती करावी लागते. पण कायद्यातील तरतुदीनुसार कलम 15 व 16 यात कायद्याने दुरुस्ती केली तर घटनेत बदल होऊ शकतो. यामुळे आरक्षण हे घटनात्मक दृष्ट्या शक्य नाही म्हणूनच कोर्टाची नेहमी नकाराची भूमिका आहे.
ऊसदराबाबत इथेनॉल उत्पादन व विक्री करून एफ आरपी देऊ, साखर समुद्रात बुडवा त्यावर कशाला अवलंबून राहात ता असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले होते. याबद्दल विचारले असता गडकरी आमचे मित्र आहेत. ते मुक्तचिंतन करत असतात, असा टोलाही पवार यांनी लगावला. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा मार्ग त्यांच्याकडे आहे का? याबद्दलही विचारणार असल्याचे पवार यांनी सांगितले.डी. वाय. पाटील यांना राष्ट्रवादीचे सभासद व्हायचे होते. त्यांनी मला तशी इच्छा बोलून दाखवली. ते हितचिंतक म्हणून आमच्या सोबत आहेत.
आघाडी केल्यामुळे फायदा होतो असे चित्र आता दिसत आहे. त्यामुळे लवकरच संयुक्त सभांची मोहीम सुरू करणार असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply