वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज:पालकमंत्री सतेज पाटील

 

कोल्हापूर:वृक्षारोपण आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. दक्षिण मतदारसंघ निवडणूक जाहीरनाम्यानुसार दरवर्षी पाच हजार झाडे लावण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. वृक्षसंवर्धन करण्याची जबाबदारी आता नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.सतेज ऋतु वृक्षारोपण आणि संवर्धन या मोहीमेअंतर्गत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आज एकाच दिवशी पाच हजार झाडे लावण्यात आली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आमदार ऋतुराज पाटील, महापौर निलोफर आजरेकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि जगविणे क्रमप्राप्त आहे. ऋतुराज पाटील हे आमदार झाल्यावर मतदार संघात दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार झाडे लावणार असल्याचे आम्ही सांगीतले होते.यंदा ही मोहीम सुरू केली असून पाच वर्षे सुरू ठेवणार आहे .
आमदार ऋतुराज पाटील यांनी झाडांचे संवर्धन होण्यासाठी जेष्ठ नागरिक, महिला आणि युवक याना प्रत्येक झाड हे दत्तक देऊन त्या झाडाचे संगोपन करण्यात येणार असल्याचे सांगितले. या मोहीमे अंतर्गत पर्यावरण तज्ञांच्या सल्ल्यानुसार जादा ऑक्सीजन देणारी तसेच रस्त्यांची शोभा वाढविणारी झाडे लावण्यात येत आहेत. यामध्ये मोहगणी, सप्तपर्णी, गुलमोहर, फेलटोफोरम, कडुनिंब, वड, आंबा, सिताफळ आदी झाडांचा समावेश आहे. या झाडांची सरासरी उंची सहा फूट इतकी आहे.त्यामुळे हा पावसाळा काळजी घेतली की ही झाडे नक्की बहरतील, असा विश्वास व्यक्त केला.
याप्रसंगी उपमहापौर संजय मोहिते, गटनेता शारंगधर देशमुख, पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, निसर्गमित्र चे अनिल चौगले, जि.प. सदस्या वंदना पाटील, सरिता खोत , जि. प. चे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाजार समिती सदस्य विलास साठे ,करवीर पं. स. उपसभापती सुनील पोवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!