कोल्हापूर – अमोल पवार व विनायक पवार यांनी हाळोली ( ता. आजरा) येथे देणेकर्यांचा ससेमिरा चुकविण्यासाठी केलेल्या कार जळीत प्रकरणात हकनाक बळी गेलेल्या रमेश नाईक यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी आजरा पोलीस, दानशूर संस्था व व्यक्तींच्या सहकार्यातून निधी उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी आजरा पोलीस ठाण्यात बैठक आयोजित करण्यात आली होती. पोट भरण्यासाठी विजापूर येथून आलेल्या रमेश नाईक यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. पोटाच्या मागे गेलेला रमेश या हत्याकांडात मारला गेला एवढीच त्यांच्या घरच्यांना माहिती होती. जळून शिल्लक राहिलेल्या देहाचे अवयवही त्यांना मिळालेले नाहीत. कर्ती व्यक्ती कुटुंबातून निघून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. कुटुंबातील बहुतांश सदस्य आजारी पडले आहेत.
या पार्श्वभूमीवर रमेशच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे. त्याच्या कुटुंबीयांना असणार्या आर्थिक व मानसिक मदतीची गरज ओळखून आजरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र कदम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी उभारण्याचा संकल्प केला आहे.
Leave a Reply