
कोल्हापूरचा टोल बंद करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) विधानसभेत केली.
राज्यभरात चर्चेत असलेला कोल्हापूर टोलचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. कोल्हापूरकरांच्या टोलविरोधी आंदोलनाला आजच्या निर्णयाने यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टोल विरोधात कोल्हापुरात जनआंदोलन सुरू होते. प्रा. एन. डी. पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यासह अनेकजण या टोलविरोधी लढ्यात उतरले होते.
कोल्हापुरातील शहरांतर्गत टोल बंद करण्याची घोषणा कोल्हापूरचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी केली होती. मात्र, आयआरबीने लेखी आश्वासन न मिळाल्याने टोलवसुली सुरूच ठेवली होती. आयआरबीच्या विरोधात शिवसैनिकांनीही टोलची जाळपोळ केली होती. कोल्हापूरकरांनी पोलिस संरक्षणही झुगारून लावत टोलवसुली होऊ दिली नव्हती. अखेर आज या लढ्याला यश आले आहे.
महिन्याअखेरपर्यंत कोल्हापूर टोलमुक्त करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गेल्या महिन्यात दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आज टोल बंदची घोषणा केली. दरम्यान, टोलनाके बंद झाल्यानंतर आयरबीला किती आणि कशी रक्कम द्यायची याबाबत सरकारने काय निर्णय घेतला आहे, याबाबतची माहिती समजू शकलेली नाही.
Leave a Reply