
कोल्हापूर : खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाड्यापेक्षा जास्तीत जास्त दीडपट भाडे आकरण्याचा (शासनाचे दर १०० रुपये असतील, तर खाजगी ट्रॅव्हल्सवाले १५० रुपये घेऊ शकतात.) नियम दिनांक २७ एप्रिल २०१८ च्या शासन आदेशाद्वारे करण्यात आला आहे. असे असतांनाही खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक दिवाळीत, अन्य सणांच्या वेळी, तसेच सुटीच्या कालावधीत तिकिटदरात दुप्पट-तिप्पट वाढ करून प्रवाशांची आर्थिक लूट करत आहेत. याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने खाजगी टॅ्रव्हल्स व्यावसायिकांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत ४ नोव्हेंबर या दिवशी प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांना निवेदन देण्यात आले.या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, कागलतालुकाप्रमुख अशोक पाटील, करवीरतालुकाप्रमुख राजू यादव, शिवसेनेचे बंडा पाटील आणि शशिकांत पाटील, शिवसेना आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष किशोर घाटगे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, संजय कुलकर्णी, राजेंद्र शिंदे, शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, डॉ. सुरेश आनंदे, बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.कोल्हापूर ते पुणे या प्रवासासाठी खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक सणांचा कालावधी सोडून २५० रुपये ते ३०० रुपये घेतात; मात्र या दिवाळीच्या काळात खाजगी टॅ्रव्हल्सचे तिकिटदर ५०० रुपये ते ७०० रुपयापर्यंत वाढवण्यात आले होते. याचसमवेत कोल्हापूर ते मुंबई ४०० रुपये ते ५०० रुपये असतांना ते सध्या ८०० रुपये, १००० रुपये ते १२०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहे. राज्यात सगळीकडे अशीच परिस्थिती आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे ट्रॅव्हल्सवाल्यांचे फावले आहे.
Leave a Reply