जोतिबाचे खेटे आजपासून सुरू:भाविकांची जोतीबा डोंगरावर गर्दी

 
वाडी रत्नागिरी (रोहित मिटके) : येथील श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर रविवार म्हणजे आजपासून खेटय़ांना प्रारंभ होत असून, त्यासाठी जोतिबा डोंगर सज्ज झाला आहे. माघ महिन्यात जोतिबाचे पाच खेटे घातले जातात. यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतून लाखो भाविक दरवर्षी येत असतात. या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडतात. ‘श्रीं’ची अलंकारयुक्त महापूजा बांधली होती. खेटय़ांच्या पार्श्वभूमीवर डोंगरावर सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.जोतिबाच्या खेटय़ांना पहाटे चारपासून प्रारंभ होतो. कुशिरे, पोहाळे तर्फ आळते, गायमुख तलाव येथील डोंगरवाटेतून पहाटे पायी चालत जाऊन भाविक खेटे पूर्ण करतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने डोंगरपठारे दुमदुमून जातात. गायमुख तलावास जत्रेचे स्वरूप येते. ग्रामपंचायतीने स्वच्छता, पिण्यासाठी मुबलक पाणी देण्यासाठी प्रयत्न केला आहे.
माघ महिन्यात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणा-या यात्रेस जोतिबाचे खेटे म्हणतात. या रविवारी भाविक शक्यतो अनवाणी चालत येतात. यात महिला भाविकांची संख्याही लक्षणीय असते.पूर्वी केदारनाथ (जोतिबा) आपली दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाले. हे करवीर निवासनी श्री अंबाबाई देवीस कळताच ती अनवाणी कोल्हापूरहून डोंगरावर आली व तिने केदारनाथांना जाऊ नये, असे विनवले. तेव्हा केदारनाथांनी वाडी रत्नागिरीवर (जोतिबा डोंगर) राहण्याचे मान्य केले. तेव्हापासून पायी खेटे घालण्याची प्रथा सुरू झाली.खेटे पूर्ण झाले की जोतीबाची चैत्र महिन्यात पौर्णिमेला मोठी यात्रा भरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!