
कोल्हापूर:गवसे ता. आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतला आहे. आज शनिवारी (ता.२५) सायंकाळी पाच वाजता झालेल्या बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय झाला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्र कार्यालयाच्या सभागृहात अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला आमदार राजेश पाटील, सर्जेराव पाटील- पेरीडकर, श्रीमती उदयानीदेवी साळुंखे, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, असिफ फरास, रणजीतसिंह पाटील आदी संचालक उपस्थित होते.याबाबत अधिक माहिती अशी, ३१ मार्च २०२० अखेर या कारखान्याकडील बँकेची थकबाकी १०४ कोटी रुपये होती. या थकबाकीच्या वसुलीसाठी बँकेने सिक्युरिटायझेशन अॅक्ट – २००२ नुसार हा कारखाना ताब्यात घेतला. त्यानंतर बँकेने बँकेसह, शेतकरी, कामगार, शासकीय देणी व इतर सर्व अशी २०७ कोटी रुपयांची देणी निश्चित केली. ही सर्व देणी आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व चार्टर्ड अकाउंटंटकडून प्रमाणित झालेली आहेत. ही देणी भागविण्यासाठी कमीत कमी वर्ष चालविण्यासाठी लिव्ह अँड लायसन्स या तत्त्वावर देण्याचा ठराव झाला. याबाबत बँकेच्या वतीने लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.
Leave a Reply