
कोल्हापूर : धनंजय मुंडे यांनी केलेल्या कृत्याचा पश्चाताप म्हणून स्वत:हून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मुंडे यांच्या राजीनाम्याची दोन, तीन दिवस वाट पाहू. नंतर भाजपतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल.’असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. तसेच
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी गेल्या पन्नास वर्षाच्या कालावधीत नैतिकतेचे राजकारण केले आहे. राजकारणाचा भाग म्हणून त्यांनी एकाला बाजूला करुन दुसऱ्याला घेतले असले प्रकार सोडले तर त्यांचे राजकारण शुद्ध आहे. यामुळे ते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा नक्की घेतील.’असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील हे बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत:हून त्यांच्या कृत्याबद्दल कबुलीनामा दिला आहे. राज्याच्या राजकारणात बहुतेक असा पहिलाच प्रकार असावा. तक्रार केलेल्या महिलेच्या बहिणीशी मुंडे यांचे पंधरा वर्षापासूनचे संबंध, दोन मुलांना स्वत:चे नाव लावणे याविषयी त्यांनी कबुली दिली आहे. हा सगळा प्रकार लोकशाही संकेत, नैतिकता आणि कायद्याच्या चौकटीत बसत नाही. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांचा राजीनामा घेतील. असेही ते म्हणाले.
Leave a Reply