
कोल्हापूर : मे महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात वाढलेली उष्णतेची तीव्रता या उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी एस.आर.बर्गे यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेमुळे शरीरावर गंभीर परिणाम होण्याची तसेच प्रसंगी शारिरीक ताण पडून मृत्यू ओढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय उन्हात बाहेर पडू नये तसेच उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी विविध प्रसार माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच सूचना प्रसारीत होत असतात त्याचाही अवलंब करावा. असे सांगून एस.आर.बर्गे यांनी उष्णतेच्या लाटे पासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी यासाठी आवाहन केले आहे. यामध्ये तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सचिद्र सूती कपडे वापरावीत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/हॅट, बुट व चपलाचा वापर करावा. प्रवासात पाण्याची बाटली सोबत घ्यावी. जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा, तसेच ओल्या कापड्यांनी डोके, मान चेहरा झाकावा. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ. आर. एस. घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करावा. अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणार घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवावे त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा. पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रके घेऊन नियमित आराम करावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घ्यावी.
काय करु नये- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत तसेच दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बाहेर काम करण्याचे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. मोकळ्या हवेसाठी स्वयंकपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. शारिरीक पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेला चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे, असे आवाहन केले आहे.
Leave a Reply