

कृतांत’ या चित्रपटाची निर्मिती निर्माते मिहीर शाह यांनी रेनरोज फिल्म्सच्या बेनरखाली केली आहे. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याच्या भूमिकेत आहेत. दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात संदिप कुलकर्णी एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सदैव निसर्गाच्या सानिध्यात राहणारा आणि निसर्गप्रेमी अशी ही भूमिका आहे. दत्ता भंडारे यांनीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. या चित्रपटातील भूमिकेबाबत बोलताना संदिप म्हणाले की, तसं पाहिलं तर ‘कृतांत’ या शीर्षकावरून या चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावणं कठीण आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्टय आहे. कथेबाबत जास्त काही सांगता येणार नाही, परंतु या चित्रपटाचा विषय आजच्या धावपळीच्या व्यावहारिक जीवनाशी अनायसे जुळून आलेला तात्त्विकतेचा संबंध अधोरेखित करणारा असल्याचं मात्र नक्की सांगेन. ‘कृतांत’मध्ये मी साकारलेली व्यक्तिरेखा शब्दांत सांगणं तसं कठीण असून इतक्यात ते सांगून त्यातील रहस्य उलगडणं ठीक नाही. भूमिका निवडताना मी नेहमीच चोखंदळ असतो. एका प्रकारच्या भूमिकेत मी पुन्हा कधीच दिसलो नाही. ‘कृतांत’ची ऑफर स्वीकारताना देखील याची काळजी घेतली आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी असेल हे वेगळ सांगण्याची गरज नाही. नातेसंबंध आणि आजचं जीवन हा या चित्रपटाचा गाभा असून तोच खरा या चित्रपटाचा नायक आहे असं माझं मत आहे. या चित्रपटाची कथा आजच्या काळातील असल्याने प्रत्येकाला ती आपलीशी वाटेल, प्रत्येकजण त्यातील व्यक्तिरेखेच्या जागी स्वतःला पाहिल आणि हेच या चित्रपटाचं यश असल असं मतही संदिपने व्यक्त केलं.
कृतांत’मधील ही दमदार व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तितक्याच ताकदीचा नट मिळणं ही कथेच गरज असल्याचं सांगत दिग्दर्शक दत्ता मोहन भंडारे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली एक ताकद, ऊर्जा, उंची आणि मर्यादा असते. जो कलाकार या सर्व गोष्टींची पूर्तता करीत व्यक्तिरेखा साकारतो ती प्रेक्षकांच्या मनाला भिडते. या व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची निवड करताना सर्वप्रथम संदिप कुलकर्णी यांचाच चेहरा डोळयांसमोर आला. तेच या व्यक्तिरेखेला अचूक न्याय देऊ शकतील असं वाटलं. त्यांना जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा ते देखील आनंदाने तयार झाले. मराठीपासून हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा संदिप कुलकर्णी यांसारखा कलाकार जेव्हा चित्रपटात काम करायला तयार होतो तेव्हा संपूर्ण टिमलाही हुरूप येतो. त्यांच्यासोबत चित्रीकरण करतानाही एक वेगळाच अनुभव येत असल्याचं भंडारे म्हणाले.
संदिप कुलकर्णी यांच्यासोबत या चित्रपटात सुयोग गोरहे, विद्या करंजीकर, सायली पाटील, वैष्णवी पटवर्धन आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजय मिश्रा या चित्रपटाचे केमेरामन असून दत्ताराम लोंढे कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी पार पाडीत आहेत
Leave a Reply