गोकुळची निवडणूक तात्काळ सुरू करून महायुती म्हणूनच लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश : अध्यक्ष नवीद मुश्रीफ   

 

मुंबई : मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू करून ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सर्वांना दिल्या आहेत, असे स्पष्टीकरण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. या संदर्भातील अपुऱ्या माहितीवरील कोणत्याही बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, मंगळवार दि. २८ रोजी रात्री गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीससाहेब यांच्यासमवेत महायुतीमधील सर्व नेतेमंडळींची तास ते दीड तासभर व्यापक बैठक झाली. मुंबईत त्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, शिवसेनेचे आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनयराव कोरे, आमदार राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम उपस्थित होते.

दरम्यान; या निवडणुकीत नवीन आलेल्या कायद्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीससाहेब म्हणाले की , ही निवडणूक मी ताबडतोब लावतो. विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत, त्याबाबतची माहितीही मुख्यमंत्री यांनी दिली. त्यावर काय उपाय शोधता येतील, याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी आपापली मते सुचविली आहेत. आज बुधवार दि. २९ कायदे सल्लागारांची बैठक घेऊन या दोन्हीही मुद्द्यांवर मी तोडगा काढतो आणि महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवा, असा आदेश मुख्यमंत्री श्री. फडणवीससाहेब यांनी आम्हा सर्व नेतेमंडळींना दिला आहे.

 

 

Comments are closed.

error: Content is protected !!