कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शनिवारी (२५ जुलै) कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन व कँडल मार्च आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे राज्यव्यापी आंदोलन छेडले जात आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरामध्ये राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे सायंकाळी ५:०० ते ७:०० या वेळेत हे आंदोलन होणार आहे. सायंकाळी ५ ते ६ या दरम्यान राजाराम गार्डन जनता बाझार चौक राजारामपुरी येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात येईल.
सायंकाळी ६ ते ७ या वेळेत राजाराम गार्डन येथून ‘आईचा पुतळा’ मार्गे सायबर कॉलेज पर्यंत कँडल मार्च काढण्यात येईल. या आंदोलनात खासदार शाहू छत्रपति, काँग्रेसचे विधानपरिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, राजूबाबा आवळे, गणपतराव पाटील, सुर्यकांत पाटील बुद्धीहाळकर, शशांक बावचकर, संजय कांबळे, तौफिक मुल्लाण्णी, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, इंद्रजीत बोंद्रे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, तालुकाध्यक्ष, जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, महिला, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, एनएसयूआयचे प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित राहणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या सरकारला जागा करण्यासाठी कोल्हापुरातील सर्व नागरिक, विद्यार्थी, तरुण आणि पालकांनी या धरणे आंदोलन व कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष प्रविण केसरकर यांनी केले आहे.
