
कोल्हापूर : कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पूर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या बेबंद, बेधुंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे. राज्यात असुरक्षिततेचे, निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार मध्ये असणाऱ्या मंत्र्यांवरच घोटाळे, बलात्कार असे आरोप होताना दिसत आहेत. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवरच पोलीस खात्याकडून शंभर कोटीची खंडणी घेतल्याचा आरोप जर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त करत असतील तर जनतेने या महाविकास आघाडी सरकारकडून विकासाची, सुरक्षिततेची काय म्हणून अपेक्षा ठेवायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉकडाऊनमुळे जनतेची अर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. यामुळे भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी रस्त्यावरती उतरून लॉकडाऊनमधील वाढीव वीजबिल माफ करावे म्हणून निदर्शने केली. ही वीजबिले माफ न करता उलट वीज कनेक्शन तोडणी सरकारने सुरु केली आहे. वाझे सारख्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला तसेच भ्रष्टाचारी गृहमंत्र्यांना महाविकास आघाडी सरकार पाठीशी घालत आहे आणि गरीब जनतेचे वीज कनेक्शन तोडत आहे.राज्याला संकटात ढकलणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी कोल्हापूर च्या वतीने आज संपूर्ण कोल्हापूर शहरात भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली “ महाविकास आघाडी सरकारला जाब विचारूया – जनतेशी संवाद साधूया” हे अभियान राबविण्यात आले. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता, गुन्हेगारी अशा दुष्कृत्यांचा पाढा वाचण्यासाठी, महाविकास आघाडी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर येण्यासाठी हे अभियान राबवत असल्याचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सांगितले.
Leave a Reply