
कोल्हापूर : देशभरात लागू होणाऱ्या जीएसटी विरोधात आज राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला. कोल्हापुरात व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन बंद यशस्वी केला. व्यापारी व व्यावसायिकांच्या ३५ संघटनांनी शहरातून रॅली काढून व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी ‘जीएसटी’ तील जाचक अटी रद्द करून जीवनावश्यक वस्तूंना या करातून वगळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.
केंद्र सरकारमार्फत १ जुलैपासून लागू होणाऱ्या जीएसटी म्हणजेच वस्तु व् सेवा कर यातील जाचक अटींव्विरोधात व्यापाऱ्यांनी आज बंदची हाक दिली. कोल्हापुरातील सर्व व्यापाऱ्यानी सहभागी होत सकाळपासूनच आपली दुकाने बंद ठेवली. निषेध व्यक्त करण्या साठी शहरातून दुचाकी रॅली काढली. रॅलीला चेंबर आॅफ काॅमर्सच्या कार्यालयापासून सुरुवात झाली. राजारामपुरी, बिंदू चौक, गुजरी, महाद्वार रोड, व्हीनस काॅर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. या वेळी चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, ग्रीन मर्चंट असोसिएसनचे अध्यक्ष किशोर तांदळे, प्रदिपभाई कापडीया, जयेश ओसवाल, रणजित पारेख, रमेश कार्वेकर, बाबाराव कोंडेकर, चंद्रकांत जाधव, संजय शेटे, श्रीनिवास मिठारी, वैभव सावर्डेकर, नयन प्रसादे, गणेश सन्नका आदी उपस्थित होते.
या वेळी ललित गांधी म्हणाले, शासनाने जीएसटीत जीवनावश्यक वस्तू तथा अन्नधान्य, कपडे यावर कर लावणार नसल्याचे सांगितले होते, पण अंमलबजावणीत मात्र ब्रॅन्डेड अन्नधान्य व कपडयावरही ५ टक्के कराची आकारणी करणार असून याचा फटका प्रत्यक्ष सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे शासनाने या करातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली.आजच्या बंदमुळे लाखो रूपयांची उलढाल ठप्प झाली.शहरातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट होता.
Leave a Reply