समीर गायकवाड यांना जामिन म्हणजे पुरोगाम्यांना सणसणीत चपराक : सनातन संस्था

 

 कोल्हापूर:अखेर सत्याचा विजय झाला. कोल्हापूरमधील सत्र न्यायालयाने सनातनची न्याय्य बाजू मान्य करत अटकेत असलेले सनातनचे साधक समीर गायकवाड यांना जामीन मंजूर केला. त्याविषयी आम्ही मा. न्यायालयाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

समीर गायकवाड निरपराध आहे, हे आम्ही प्रारंभीपासून ओरडून सांगत होतो; मात्र काही दांभिक व विद्वेषी पुरोगाम्यांनी जाणीवपूर्वक सनातन संस्थेला कलंकीत करण्यासाठी सनातनवर नाहक खोटेनाटे आरोप केले. तपास यंत्रणांनी स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांचा बळी देण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे. समीर गायकवाड हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील साधक खोट्या आरोपांमुळे गेली दोन वर्ष तुरूंगात राहिले. त्याच्या आयुष्यातील वाया गेलेला वेळ, झालेली मानहानी आणि मानसिक त्रास कोणीही भरून देऊ शकत नाही.

समीर यांचा खटला त्वरित चालू करावा,अशी आम्ही सातत्याने मागणी करत आहोत; मात्र जाणीवपूर्वक ‘तारीख-पे-तारीख’ घेण्याचा प्रकार तपास यंत्रणांकडून चालवला जात आहे. एका शेतकर्‍यांच्या मुलाला तुरुंगात अडकवण्यासाठी पुरोगाम्यांच्या दबावाखाली येऊन ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांना एक तारखेसाठी 75 हजार रुपये दिले जात होते. तर दुसरीकडे सर्वांत गंभीर प्रकरण असलेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आतंकवादी कसाबच्या खटल्यात ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना केवळ ३० हजार रुपये दिले गेले होते. इतकेच नव्हे, तर समीरला जामीन मिळू नये म्हणून मुंबईतील आणखीन काही नामांकीत वकीलांचे साहाय्य घेण्यात आले. यात शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला; मात्र‘कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवण्याचा थांबत नाही’,या म्हणीप्रमाणे समीरला जामीन मिळाला. जामीन हा पुरावे नसल्याचे एक लक्षण आहे.

सनातन संस्थेचा न्यायदेवतेवर पूर्णता विश्‍वास आहे.त्यामुळे एक दिवस समीर निश्‍चित निर्दोष मुक्त होईल, अशी आम्हाला खात्री आहे. या निकालामुळे सनातनच्या सर्व साधकांना आणि हिंदुत्वनिष्ठ यांना आज खूप आनंद झाला आहे. ईश्‍वरी कृपेमुळे आज  समीर यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. हा जामीन म्हणजे पुरोगाम्यांना मिळालेली सणसणीत चपराक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!