
कोल्हापूर: वास्तवाशी भिडणाऱ्या चित्रपटांचे प्रेक्षकांनी नेहमीच चांगले स्वागत केले आहे. समाजात वावरत असताना सर्जनशील आणि संवेदनशील व्यक्तींना जाणवणाऱ्या अनेक विषयांना यामुळे चित्रपटांमध्ये स्थान मिळाले आहे. अपप्रवृत्ती विरोधातील लढा दाखवताना एका स्त्रीने केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा मिलिंद कांबळे दिग्दर्शित ‘माझा एल्गार’ हा मराठी चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निखळ मनोरंजनाचे व सामाजिक भान जपणाऱ्या सद्गुरु फिल्म प्रस्तुत ‘माझा एल्गार’ या चित्रपटाची निर्मिती सौरभ आपटे यांनी केली असून श्रीकांत आपटे त्याचे प्रस्तुत करते आहेत. श्रद्धेच्या नावाखाली जो बाजार मांडला जातो त्यावर ‘माझा एल्गार’ हा चित्रपट भाष्य करतो. गावातल्या एका अपप्रवृत्तीच्या महंता विरोधात एका स्त्रीने उभारलेला लढा दाखवतानाच तरुणाईने मनात आणलं तर ते समाजात नक्कीच चांगला बदल घडवू शकतील हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न या चित्रपटांतून केला आहे. आजच्या काळातील तरुणी आणि देवभोळ्या जनतेला आपल्या जाळ्यात ओढणारा धूर्त महंत यांच्यातील चित्तथरारक संघर्ष यात पहायला मिळेल.
या चित्रपटांत वेगवेगळ्या प्रकारची चार गाणी असून आदर्श शिंदे यांनी ती गायलेली आहेत. तसेच सौरभ शेटे व आनंदी जोशी या गायकांनी ही गाणी गायली आहेत. अभिजीत सकपाळ व मिलिंद कांबळे यांनी गीते लिहिली आहेत. ऐश्वर्या राजेश व यश कदम या नव्या जोडीसोबत स्वप्नील राजशेखर अमोल रेडीज,अर्चना जोशी, ऋचा आपटे ,गंधार जोशी, प्रफुल्ल घाग राजकिरण दळी, गोपाळ जोशी सचिन सुर्वे, नितीन जाधव,पूजा जोशी, वैदही पटवर्धन, भगवान नारकर या कलाकारांच्या भूमिका यात आहेत. चित्रपटाची पटकथा-संवाद चेतन कींजळकर यांनी लिहिले आहे. छायांकन उमेश पोफळे तर संकलन नकुल,प्रसाद पावसकर यांचे आहे. चित्रपटाला संगीत सौरभ- दुर्गेश यांनी दिले आहे. मला सर्वच भूमिका आवडतात पण चित्रपटामध्ये खलनायिकेची भूमिका साकारताना खूप चांगले वाटले असे स्वप्नील राजशेखर यांनी सांगितले.तसेच चित्रपट बनवत असताना काय अनुभव आले तसेच चित्रपटाविषयी आज ‘माझा एल्गार’ च्या संपूर्ण टीमने पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. एक सामाजिक ज्वलंत विषय हाताळल्या असल्यामुळे तसेच त्यातून सामाजिक संदेश मिळणार असल्याने हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज कोल्हापुरात व्यक्त केला.
Leave a Reply