कोल्हापूर शहराला समस्या मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक मंत्रालय विभाग सर्वतोपरी मदत करेल ना:नितीन गडकरी 

 

कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजप- ताराराणी आघाडीचे नगरसेवक सध्या दिल्ली अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे बळकटीकरण, शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे रखडलेले काम आणि कोल्हापूर शहरात नवे उड्डाण पुल बांधण्याबाबत चर्चा झाली. नामदार गडकरी यांनी, कोल्हापूर शहराला समस्या मुक्त करण्यासाठी आपला विभाग सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.
भाजप- ताराराणी आघाडीतील सुमारे ३० नगरसेवक दिल्ली दौर्‍यावर गेले असून, आज या नगरसेवकांनी संसदेचे कामकाज कसे चालते, हे पाहण्यासाठी संसदेत उपस्थिती लावली. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या नगरसेवकांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीत कोल्हापूरच्या विविध प्रश्‍नांबद्दल नगरसेवकांनी नामदार गडकरी यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी महानगरपालिकेचा परिवहन विभाग अस्तित्वात आहे. के एम टी च्या माध्यमातून सार्वजनिक प्रवासी वाहतुक सध्या सुरू आहे. मात्र बदलत्या काळानुसार परिवहन विभागाला पर्यावरण पुरक आणि कमी खर्चाच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी नगरसेवकांच्या शिष्ट मंडळाने केली. नागपूरच्या धर्तीवर कोल्हापूर महापालिकेला इलेक्ट्रीक बसेस किंवा इथेनॉलवर चालणार्‍या बसेस मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्याला नामदार गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. कोल्हापूर महानगरपालिकेने राज्य शासनामार्फत ५० इलेक्ट्रीक बसेस मागणीचा प्रस्ताव द्यावा, त्याला तत्काळ अनुमती देवू अशी ग्वाही नामदार गडकरी यांनी दिली. या बसेस महापालिकेला संपूर्ण मोफत मिळतील. केवळ दररोज ठराविक किलोमीटर बसेस धावतील, याची ग्वाही देवून, ठरलेल्या प्रति किलोमीटर दरानुसार बस पुरवठा करणार्‍या कंपनीला पैसे अदा करावेत, अशी संकल्पना नामदार गडकरी यांनी मांडली. या बसेसच्या चालकांचा, देखभाल दुरूस्तीचा खर्चही महापालिकेला करावा लागणार नाही. तसेच इथेनॉलवर चालणार्‍या बसेस देण्यासही नामदार गडकरी यांनी संमती दर्शवली. इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखाने आणि पर्यायाने शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे इथेनॉलवर आधारीत बसेस देण्यासही केंद्र सरकार तयार असल्याचे नामदार गडकरी यांनी सांगितले. सध्या कोल्हापूर ते रत्नागिरी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचा विषय गाजतो आहे. मात्र रत्नागिरीकडे जाणार्‍या महामार्गावर पोहोचण्यासाठी वाहनांना कोल्हापूर शहरातून जावे लागते. त्यामुळे शहरातील वाहतुक कोंडी वाढणार आहे. अशा परिस्थितीत तावडे हॉटेल ते रत्नागिरीकडे जाणारा रस्ता या मार्गावर नवा प्रशस्त उड्डाण पुल बांधावा, अशी मागणी नामदार गडकरी यांच्याकडे करण्यात आली. या मागणीला नामदार गडकरी यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. तर शिवाजी पुलाला पर्यायी पुल बांधण्याचे काम अजुनही रखडले असल्याचे नामदार गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले. पुरातत्व खात्याच्या कायद्यामध्ये बदल होण्यासाठी लोकसभेत मंजुरी झाली आहे, मात्र राज्य सभेत अद्यापही या विधेयकाला मंजुरी मिळालेली नाही. याबाबत तोडगा काढण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांना सोबत घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवू, असे नामदार गडकरी म्हणाले. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार केंद्र सरकार विशेष अध्यादेश काढेल आणि पर्यायी पुलाचे काम पूर्ण करू, असे नामदार गडकरी यांनी नगरसेवकांना अभिवचन दिले. एकूणच कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवकांची नामदार गडकरी यांच्याशी झालेली भेट अत्यंत सकारात्मक आणि कोल्हापूरसाठी हितावह ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!