कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य नागरी पतसंस्था फेडरेशन महिला नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांची निवड झाली.याप्रसंगी सौ. अरुंधती महाडिक यांनी फेडरेशनने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले. तसेच ही जबाबदारी अत्यंत मोठी असून सर्वांच्या मार्गदर्शन व सहकार्याच्या बळावर ती यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पतसंस्थेसमोर अनेक अडचणी आणि आव्हाने होती. या संदर्भात वेळोवेळी मा. खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या माध्यमातून संबंधित प्रश्न मांडण्यात आले असून त्यांनी संसदेतही विषय उपस्थित करून या क्षेत्राला बळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे त्यांनी नमूद केले.
तसेच खासदार मा. धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सोळा वर्षे भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा संघर्षमय व प्रेरणादायी प्रवास सुरू असल्याचे सांगत महिलांना एकत्र आणणे, त्यांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हेच ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या काळात अधिकाधिक महिला पुढे येऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि नेतृत्व स्वीकारतील, असा विश्वास यावेळी सौ. महाडिक यांनी व्यक्त केला.
