केएमटीतील रोजंदारी व अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घ्या : सभापती सत्यजित जाधव 

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत केएमटी विभागातील रोजंदारी व अनुकंपा कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, त्याचा परिणाम केएमटीच्या दैनंदिन कामकाजावर होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. केएमटी विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील ऑफिस प्रस्ताव ई-फाईल क्रमांक ८३५०८० द्वारे नगरविकास कार्यालयाकडे तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच अनुकंपा तत्त्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम सामावून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठीचा प्रस्ताव ई-फाईल क्रमांक ११३०५६८ ने नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला असून, तोही अद्याप निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे.
या दोन्ही प्रस्तावांबाबत अंतिम निर्णय होत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कर्मचारी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अल्प मानधनावर सेवा बजावत असून, कायम सेवेच्या प्रतीक्षेत त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सभापती सत्यजित जाधव यांनी केली आहे.केएमटी ही कोल्हापूर शहराच्या सार्वजनिक वाहतुकीची जीवनवाहिनी मानली जाते. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने लवकरात लवकर निर्णय घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी सभापती सत्यजित जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, नगरसेवक स्वरूप कदम, नगरसेवक प्रसाद जाधव, रोहन अतिग्रे, युनियनचे अध्यक्ष सचिन जाधव आदी उपस्थित होते.

Comments are closed.

error: Content is protected !!