श्री अंबाबाई मंदिरात “पगारी पुजारी” नेमावेत :आ.राजेश क्षीरसागर

 

मुंबई : साडे शक्तीपीठांपैकी एक असलेले कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले आहे. हा डाव हाणून पाडण्या जन आंदोलन सुरु असून, श्री अंबाबाई मंदिरातील पुजारी हटवून त्याठिकाणी शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर च्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले एसआयटी चौकशी नेमण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणी करीत मुंबई येथे आज पासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार राजेश क्षीरसागर यांनी “आता कोल्हापूरची महालक्ष्मी नाही, कोल्हापूरची अंबाबाई” अशा आशयाचा फलक घेऊन श्री अंबाबाई चा जयघोष करीत विधानभवनात प्रवेश केला.
यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, देशभरासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबाबाई मंदिरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भ्रष्टाचार होत आहे. श्री अंबाबाई ला भाविकांनी श्रद्धेने दान केलेले दागिने, रोख रक्कम आदी वस्तूंची लुट पुजाऱ्यांच्या कडून होत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या लाखो करोडो रुपयांच्या जमिनींचा अपहारही झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याबाबत मार्च २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सभागृहात मी लक्षवेधी प्रश्न सादर केला होता. या लक्षवेधी प्रश्नास उत्तर देताना मुख्यमंत्री नाम. देवेंद्र फडणवीस यांनी, सहा महिन्यात एसआयटीची नियुक्ती करून चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु यास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लोटला तरी कोणतीही कार्यवाही शासनाकडून झालेली नाही. त्यामुळे मा.मुख्यमंत्री महोदय देवस्थान समितीतील भ्रष्टाचार्याना पाठीशी घालत आहेत का अशी शंका निर्माण होत आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर पूर्तता करून भ्रष्टाचाराची पाळेमुळे उखडून काढावीत, अशी मागणीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.
ते पुढे म्हणाले कि, गेले दोन ते तीन महिने कोल्हापूर अशांत आहे. श्री अंबाबाई ला विष्णुपत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान पुजाऱ्यांकडून होत आहे. याला कोल्हापूर शहरातील जनतेने तिव्र विरोध केला आहे. श्री अंबाबाई च्या पोशाखावरून समस्त भाविकांच्या भावनाही या पुजार्यांनी दुखावल्या आहेत. गेली कित्तेक वर्षे मंदिराच्या गाभार्यात ठाण मांडून बसलेल्या या पुजार्यांनी भाविकांची अक्षरश: लुट केली आहे. राजर्षि छ. शाहू महाराज यांच्या आदेशानुसार श्री अंबाबाईच्या नित्यनियमित पूजेसाठी काही पुजाकांची नेमणूक केली होती. परंतु ज्या पुजार्यांची नेमणूक केली आहेत त्यातील एकही पुजारी सध्या कोल्हापुरात नाही आहे. या पुजार्यांनी कमिशन बेस वर दुसर्या पुजार्यांची नेमणूक श्री अंबाबाई मंदिरात केली आहे आणि त्यांच्याकडून आर्थिक लाभापोटी कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईला श्री विष्णू पत्नी महालक्ष्मी करण्याचे कटकारस्थान रचण्यात येत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातील भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पुजारी हटवून, त्याठिकाणी शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर च्या धर्तीवर पगारी पुजारी नेमावेत, अशी आज लक्षवेधी प्रशानाद्वारे सभागृहात मागणी करणार असल्याचेही आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!